लेखन म्हणजे कल्पनेतली भावना, आणि संपादन म्हणजे अनुभवलेली भावनाः राजू हिरानी

 

लेखन म्हणजे कल्पनेतली भावना, आणि संपादन म्हणजे अनुभवलेली भावनाः राजू हिरानी

(अशोक रा. शिंदे यांजकडून)

दिवे मंदावले, मनांची कवाडे खुली झाली आणि सर्जनशीलतेचा आविष्कार घडला कारण आज इफ्फीमध्ये एका कार्यशाळेत  मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या सहभागींना कार्यशाळेच्या धड्यांऐवजी एका सिनेमॅटिक ऊर्जेची अनुभूती मिळाली. ज्या क्षणी राजू हिरानी यांचे आगमन झाले त्या क्षणापासून कला अकादमीचे सभागृह एका उत्साही वातावरणाने भरून गेले जे वातावरण सामान्यतः शुक्रवारच्या ब्लॉकस्टरच्या रिलिजच्या वेळी पाहायला मिळते. हिरांनी यांचे मार्गदर्शन संपल्यानंतरही अतिशय घाईघाईने पत्रकारांचे लिखाण सुरूच होते, संपादकांच्या माना पसंतीने डोलत होत्या आणि चित्रपटरसिक प्रेरणा आणि आश्चर्य अशा दुहेरी भावनांच्या मधली म्हणता येईल अशा भावनेच्या लाटांवर संचार करत होते. एका अत्यंत यशस्वी आणि प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने सांगितलेल्या पंचलाईन्स चित्रपटप्रेमींच्या मनात आणि हृदयावर कोरल्या गेल्या आहेत.

“लेखन म्हणजे कल्पनेतली भावना, आणि संपादन  म्हणजे अनुभवलेली भावना. लेखक पहिल्यांदा मसुदा  लिहितो, तर संपादक शेवटचा. 'थीम' अर्थात संकल्पना हा चित्रपटाचा 'आत्मा' आहे, तर कथानकातील 'संघर्ष'  'ऑक्सिजन' म्हणजे प्राणवायू  बनतो."

"चित्रपट दोन टेबलांवर तयार होतो - लेखन आणि संपादन: एक दृष्टिकोन" या विषयावर आयोजित 'मास्टरक्लास-सह-कार्यशाळे'ला संबोधित करताना, हिराणी यांनी लेखनाच्या प्रक्रियेचे सार अत्यंत काव्यमय साधेपणाने मांडले: “लेखन हे स्वप्न पाहण्याचे ठिकाण आहे.”

लेखक अमर्याद स्वातंत्र्य कशा प्रकारे उपभोगतो—अमर्याद आकाश, परिपूर्ण सूर्योदय, निर्दोष कलाकार, कोणतेही बजेट नाही आणि कोणतीही बंधने नाहीत, असे त्यांनी सांगितले. मात्र, हे कल्पनेतले दृश्य जेव्हा संपादकाच्या  टेबलावर पोहोचते, तेव्हा वास्तवतेमुळे त्यात अपरिहार्यपणे बदल होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

हिरानी यांनी नमूद केले की, “एखाद्या पात्राला जेव्हा खरोखर काहीतरी हवे असते, तेव्हाच चित्रपट सुरू होतो. ती इच्छाच कथानकाचा प्राण  बनते. आणि संघर्ष—तो म्हणजे ऑक्सिजन आहे,” ते पुढे म्हणाले, “त्याशिवाय कोणालाही श्वास घेता येणार नाही.” त्यांनी लेखकांना त्यांच्या कथा प्रत्यक्ष जीवनातील अनुभवांवर आधारित असाव्यात असे आवाहन केले.

"एका चांगल्या लेखकाने जीवनातून प्रेरणास्रोत  निवडले पाहिजेत. वास्तविक अनुभव, कथांना अविश्वसनीय, अनोख्या आणि अत्यंत आकर्षक बनवतात," असे त्यांनी अधोरेखित केले.त्यांनी श्रोत्यांना याची  देखील आठवण करून दिली की 'एक्सपोझिशन' अर्थात कथेची पार्श्वभूमी ही नाट्यामध्ये अदृश्यपणे गुंफलेली असावी, आणि चित्रपटाचा 'आत्मा' असलेली 'संकल्पना'  प्रत्येक दृश्यासोबत सातत्याने आपल्याशी कुजबुजत आहे असे वाटले पाहिजे, असे ते म्हणाले.

हिरानी यांनी आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल - संपादनाबद्दल - आपुलकीने बोलताना संपादन ही अतिशय सघन पण उजेडात न आलेली ताकद असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, "जेव्हा चित्रीकरण (फुटेज) संपादनकाच्या टेबलवर पोहोचते तेव्हा सर्वकाही बदलून जाते. संपादक कथेची पुनर्कल्पना करतो. तो अनाम नायक आहे. त्याचे काम दृष्य स्वरुपात दिसत नाही, परंतु ते चित्रपटाला एकत्र बांधून ठेवते," असे त्यांनी नमूद केले.

संपादकाच्या साधनांची माहिती देताना त्यांनी संपादनाचे युनिट म्हणजे शॉट आणि वेगवेगळ्या संदर्भात  एकच शॉट  पूर्णपणे  आशय बदलून येवू शकतो. "इतकी त्याच्यामध्ये ताकद असते" असे म्हणत, "एक संपादक कथा 180 अंशात पूर्णतः पालटू शकतो," असे स्पष्ट केले

चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील अग्रणींच्या वक्तव्यांचा दाखला देत हिरानी यांनी "एक चांगला संपादक तुमच्या भावनांशी खेळतो" या डीडब्ल्यू ग्रिफिथ यांच्या प्रसिद्ध उक्तीची आठवण करून दिली. तसेच त्यांनी या परिसंवादाचा शेवट: "लेखक पहिला मसुदा लिहितो. तर संपादक शेवट लिहितो," या मार्मिक सत्याने केला, त्याला तेथील उपस्थितांनी जोरदार दाद दिली

प्रमुख व्यक्तिरेखे इतकाच खलभूमिका करणाऱ्या व्यक्तिरेखेचा दृष्टिकोन सशक्त असणे गरजेचे असल्याचे हिरानी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "प्रत्येक पात्राला वाटते की आपण बरोबर आहोत. कथेत खरी जान यामुळेच येते. सत्यांचा हा संघर्ष, दृष्टिकोनांमधील हा तणाव, हेच कथेचे मर्मस्थान ठरते," असे ते पुढे म्हणाले.

नावाजलेले पटकथा लेखक अभिजात जोशी यांनी या रंजक परिसंवादात भाग घेत कथाकथनात येणाऱ्या खऱ्या जीवनातील आठवणींच्या असाधारण शक्ती बद्दलचे विचार मांडले. ते म्हणाले की काही क्षण - ते गंमतीदार, हृदयद्रावक किंवा त्रासदायक असोत - आपल्या मनात दीर्घकाळ कोरले गेलेले असतात आणि म्हणूनच त्यांच्यात एक सत्यता असते जी लेखनातून उमजलेल्या गोष्टींशी अनेकदा जुळत नाही. अशा अनेक आठवणी 'थ्री इडियट्स' मध्ये दिसल्या आहेत, ज्यामध्ये प्रसिद्ध इलेक्ट्रिक शॉकचा तो गंमतीशीर प्रसंग तसेच आपण अनेक वर्षे ज्यांना पाहत आलो अशा लोकांच्या निरीक्षणावरून बेतलेल्या पात्रांचे तपशीलवार चित्रणाचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

जोशी यांनी समारोप करताना पटकथालेखनाबाबतची काही कालातीत सत्ये सांगितली: प्रत्येक पात्रात एक झपाटून टाकणारी इच्छा असणे आवश्यक आहे, संघर्ष हा चित्रपटाचा प्राणवायू आहे आणि जेव्हा दोन वैध, परस्परविरोधी सत्ये एकमेकांना भिडतात तेव्हा सर्वात सशक्त नाट्य निर्माण होते.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs