रवांडा-महाराष्ट्र व्यापार वृध्दिसाठी विशेष प्रोत्साहनासह प्राधान्य देऊ - उच्चायुक्त जॅकलिन
रवांडा-महाराष्ट्र व्यापार वृध्दिसाठी विशेष प्रोत्साहनासह प्राधान्य देऊ - उच्चायुक्त जॅकलिन
ललित गांधी यांच्या भेटीप्रसंगी संयुक्त सहकार्य कराराचा निर्णय
नवी दिल्ली ः रवांडा-भारत देशांमधील उत्तम संबंधामुळे वेगाने वाढत असलेल्या द्विपक्षीय व्यापारामध्ये महाराष्ट्राला विशेष प्राधान्य व प्रोत्साहन देऊ असे आश्वासन रवांडा च्या भारतातील उच्चायुक्त व राजदुत श्रीमती जॅकलीन मुकानगिरा यांनी दिले.
‘वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अॅग्रो अॅण्ड एज्युकेशन’ (वेसमॅक) च्या शिष्टमंडळाने रवांडा उच्चायुक्तांच्या निमंत्रणावरून अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथील रवांडा दुतावास येथे उच्चायुक्त जॅकलिन मुकानगिरा यांची भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षापुर्वी रवांडा देशाला दिलेल्या भेटीप्रसंगी त्यांच्या समवेत दौर्यात सहभागी झालेले ललित गांधी यांनी द्विपक्षीय व्यापार वृध्दिसाठी घेतलेल्या पुढाकारास अनुसरून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
उच्चायुक्त श्रीमती जॅकलिन मुकानगिरा यांनी रवांडा-भारत देशातील संबंध अत्यंत सौहार्दपुर्ण असल्याचा विशेष उल्लेख करून रवांडा हा देश आफ्रीका देशांचे प्रवेशद्वार असुन व्यापर सुलभतेमध्ये जगात 38 व्या क्रमांकावर असुन श्रेष्ठ 50 मध्ये असलेल्या दोन आफ्रीकन देशांपैकी एक आहे.
रवांडा देशाला फर्निचर दैनंदिन जीवनावश्यक वस्तु, कृषि प्रक्रीया उत्पादने, खाद्यान्न, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, वाहने, तंत्रज्ञान अशा जवळपास सर्वच क्षेत्रातील उत्पादनांची आवश्यकता असल्याने महाराष्ट्रातील उत्पादक व निर्यातदारांना व्यापाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. रवांडा च्या एकुण 15000 कोटी रूपयांच्या आयातीमध्ये भारताकडुन सध्या 1000 कोटींच्या वस्तुंची निर्यात होते. ही भारतातुन होणारी निर्यात वाढविण्याची मोठी संधी असुन त्याचा लाभ महाराष्ट्राने घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
तसेच रवांडा मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादीत होत असलेली जगातील सर्वश्रेष्ठ कॉफी व अत्युच्च दर्जाचा चहा सारख्या उत्पादनाबरोबर रवांडातुन सोन्याची व उच्च प्रतिच्या धातुंची सर्वाधिक निर्यात होते. हजार पर्वतरांगांचा देश व गोरीलांचा देश म्हणुन ओळख असलेल्या रवांडा मध्ये पर्यटनाच्याही मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
‘वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर’ ने द्विपक्षीय व्यापार व पर्यटन विकासासाठी विशेष लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
‘वेसमॅक’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी चेंबरच्या कार्यक्षेत्रात सर्वच प्रकारचे उत्पादक व निर्यातदार असुन ‘रवांडा’ बरोबर व्यापार वाढविण्यासाठी व गुंतवणुकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रवांडा दौर्यात झालेल्या बैठकीनंतर निर्यातीत वृध्दि झाल्याचे सांगुन रवांडातील राष्ट्रीय चेंबर बरोबर ‘वेसमॅक’ चा संयुक्त सहकार्य करार करण्याची उच्चायुक्तांची सुचना मान्य करून लवकरच हा करार केला जाईल असे सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत रवांडा उच्चायुक्त कार्यालयाकडून फर्स्ट काऊन्सलर जोसेफ काबाकेजा, सेकंड काऊन्सर मुक्यो रूतिशिशा तर वेसमॅक तर्फे उपाध्यक्ष संदीप भंडारी, लता राघव यांनी चर्चेत सहभाग घेतला.
उच्चायुक्त जॅकलीन मुकानगिरा यांनी महत्वपुर्ण चर्चेबद्दल समाधान व्यक्त करून वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अॅग्रो अॅण्ड एज्युकेशन (वेसॅक) च्या शिष्टमंडळाला रवांडा भेटीचे निमंत्रण दिले.
Comments
Post a Comment